Posts

Showing posts from May, 2020

वादी

अली आणि फाझल आपल्या उंटांना शक्य तितक्या वेगात दौडवत होते. तीन दिवसांपूर्वी मिस्र देशातल्या बाजारात त्यांनी आपला माल चांगल्या चढ्या किमतीला विकला होता. खिशात अपेक्षेपेक्षा जास्त माल खुळखुळत होता.  या वेळच्या व्यापारात त्यांना चांगलाच धनलाभ झाल्यामुळे त्यांनी घरच्यांसाठी हात सैल सोडून खरेदी केली होती. परतीच्या वाटेवर ठराविक अंतरावर असलेल्या वस्त्या त्यांच्या परिचयाच्या होत्या. सवयीप्रमाणे पहाटे तांबडं फुटल्या फुटल्या प्रवासाला सुरुवात करायची, दुपारी खाण्यापिण्यासाठी वाटेतल्या माहितीच्या वस्तीत थांबायचं, पुन्हा दुपारपासून संध्याकाळपर्यंत प्रवास आणि रात्री पुढच्या वस्तीत रात्र काढायची असं त्यांच्या प्रवासाचं आयोजन असायचं.  प्रवासातल्या शेवटल्या टप्प्यात आपल्या गावापासून सहा-सात तासांच्या अंतरावरची सवयीची वस्ती त्यांना जरा जास्त प्रिय होती. ती वस्ती चार-पाच गावांपासून जवळ असल्यामुळे तिथे खाण्यापिण्याची आणि आरामाची सुरेख सोया होती. तिथल्या गावकऱ्यांच्या उपजीविकेचं साधन व्यापाऱ्यांच्या आणि प्रवाशांच्या वस्तीवर अवलंबून असल्यामुळे त्या गावात पाहुण्यांची चोख बडदास्त ठेवली जाई. अशा या गावातल्या

अफसीन

मसूद आपल्या गढीच्या छतावर उभा राहून समोरची खाडी न्याहाळत होता. त्याच्या आसपास त्याचे हुजरे, खासे सरदार, खबरे, लढवय्या गुलामांच्या तुकडीचा प्रमुख अशा अनेकांची गर्दी होती. ती गढी म्हणजे मसूदच्या तीस वर्षांच्या हिंसक आणि आक्रामक लढायांचं केंद्रस्थान होतं. त्याचे वडील खाडीच्या आसपासच्या परिसरातल्या टोळ्यांमधल्या एका टोळीचे प्रमुख होते. अरबस्तानात होणाऱ्या व्यापाराचा आणि दळणवळणाचा एकमेवच स्रोत असलेल्या त्या खाडीतून रोज अनेक होड्या, गलबतं आणि पडाव मनुष्यांची आणि सामानाची ने-आण करत असत. त्यापैकी एखाद-दुसऱ्या गलबताला अडवून अथवा त्यांच्यावर चढाई करून आपली खंडणी वसूल करणाऱ्या त्या चाचे लोकांच्या टोळ्या व्यापाऱ्यांसाठी आणि तिथल्या परिसरातल्या किडूक मिडूक राज्यांसाठी जरी डोकेदुखी असल्या, तरी त्यांच्या उपद्रवाला लगाम घालायची हिम्मत कोणाच्यात नव्हती. या टोळ्यांचा हिंसक आणि कपटी इतिहासच असा होता, की त्यांना परिसरातले काही लहान राजे आपल्या राज्याला हात नं लावण्याची खंडणी देत असत. अर्थात अशा परिस्थितीत लढाऊ जहाज अथवा गलबतांचा सुसज्जित तांडा असेल, तरच त्या खाडीतून निर्धोकपणे प्रवास करणं शक्य होतं.  सराब

तफरीह

जफर, त्याची तीन महिन्यांची गर्भवती बायको आणि त्याची ४ वर्षाची मुलगी एका ओंडक्याला लटकून मदतीची वाट बघत होते. ज्या जहाजाने ते प्रवास करत होते ते जहाज वादळात अडकून उलटलं होतं. बरोबरचे प्रवासी आपापल्या परीने जीव वाचवायचा प्रयत्न करत मिळेल त्या वस्तूला धरून पाण्यात तरंगायचा प्रयत्न करत होते. बुडण्यापूर्वी जहाजाच्या कप्तानाने मिळतील तितक्या बाटल्यांमध्ये 'आमचे प्राण वाचवा...आम्ही मत्रा बंदरापासून चार-पाच तासांच्या अंतरावर घर्रब ( पश्चिम दिशेचं अरबी संबोधन ) दिशेला वादळात अडकलो आहोत आणि आमची सफिना ( जहाज ) बुडायच्या बेतात आहे' असा संदेश लिहून बाटल्या समुद्रात जितक्या लांब शक्य होईल तितक्या लांब फेकून दिल्या होत्या. समुद्राला भरती येते तेव्हा जर त्या बाटल्या जवळपासच्या किनाऱ्यापर्यंत पोचल्या तर मदत मिळणं शक्य होतं. अर्थात मदत येईपर्यंत बुडणाऱ्या प्रवाशांना जीव वाचवण्यापलीकडे काहीही करणं शक्य नसतं. जफर मनात अल्लाहची करुणा भाकून लवकरात लवकर कोणाचीतरी मदत मिळावी अशी आशा करत होता, कारण त्याच्या लहान मुलीचा जीव फार काळ वाचवणं त्याला शक्य नव्हतं. काही तासांच्या धडपडीनंतर पाण्यात तरंगणारे अन

प्रतिमा

घारीब टोळीचा सरदार मतीन आज खुश होता. बरेच दिवसांनी त्याला त्याची युद्धाची खुमखुमी शांत करायची संधी मिळाली होती. संपूर्ण अरबस्तानाला आपल्या घोड्याच्या टाचेखाली आणायची त्याची राक्षसी महत्वाकांक्षा लहान वयापासून त्याने बाळगली होती. वयाच्या विसाव्या वर्षी आपल्या वडिलांच्या निधनानंतर आपल्या मोठ्या भावाचा कपटाने खून पाडून आणि उरलेल्या भावंडांना आपल्या धाकधपटशाने मुठीत ठेवून त्याने आपली टोळी विस्तारात नेली होती. टोळीतल्या सरदारांना रक्ताची चटक लावून त्याने बराचसा प्रदेश आपल्या अमलाखाली आणला. वेगवेगळ्या प्रदेशात आपले खास मर्जीतले सुभेदार नेमून त्याने राज्यविस्तार करताना सुद्धा आपली पकड कुठेही ढिली पडू दिली नव्हती. त्याच्या विरोधात जे जे लढले अथवा उभे राहिले, त्यांना क्रूरपणे मारून त्याने आपली दहशत बसवलेली होती. अशा या अक्राळविक्राळ असुरी शक्तीच्या विरोधात उभी असलेली एकमेव टोळी आज मतीन नेस्तनाबूत करणार होता. मलिकी टोळीचा प्रमुख इद्रीस आपल्या शत्रूंमधला बहुधा शेवटचा जिवंत शत्रू असावा, आणि म्हणूनच त्याला ठार करून आपण स्वतःला अरबस्तानाचा अनभिषिक्त सम्राट घोषित करू शकू या कल्पनेनेच मतीन हरखून गेला

सफर

शालाब गावच्या व्यापाऱ्यांचा तांडा हळूहळू आकार घेत होता. दर वर्षीप्रमाणे मागच्या आठ-दहा महिन्यात समुद्राचा तळ पिंजून काढलेले टपोरे मोती एकत्र करून गावचे व्यापारी आज वाळवंट तुडवून मिस्र देशातल्या मोठ्या बाजाराकडे कूच करणार होते. चाळीस-पंचेचाळीस दिवस वाळवंट तुडवत त्यांचा तांडा प्रवास करणार  होता. त्या तांड्याचा प्रमुख असलेला शरीफ जातीने एक एक गोष्ट नीट तपासून घेत होता. वाळवंट म्हणजे दिवसा आग ओकणारा सूर्य आणि रात्री हाडं गोठवणारी थंडी. निसर्गाच्या या रौद्र रूपात काहीतरी कमी म्हणून की काय, पण त्या वाटेवरची तुरळक मनुष्यवस्ती आणि अचानक खंडणीसाठी कधीही उपटणारे टोळीवाले या सगळ्यांचा विचार करून बऱ्याच गोष्टींची तयारी काटेकोर आणि निजोयनबद्ध रीतीने करावी लागे. गाव अशा जागी वसले होते, की वाळवंट अथवा खोल समुद्र यापैकी एक पार केल्याशिवाय मिस्र देशात पोचणं अशक्य होतं. शरीफला आधीच्या पंधरा वर्षांच्या अनुभवामुळे या सफरीची चांगली सवय झाली होती. त्याच्या वडिलांप्रमाणे तो चाळिशीतच आपल्या गावच्या काफिल्याचा म्होरक्या झाला होता. वीस-बावीस उंट, पंधरावीस खेचर आणि त्यांच्यावर लादलेलं खाण्यापिण्याचं जिन्नस, तंबू

हतीफ

अहमद आणि त्याचे दोन-तीन मित्र आपल्या मेंढ्यांना घेऊन जवळच्या कुरणाकडे निघाले होते. गावापासून थोड्याशा अंतरावर असलेल्या एका डोंगराच्या पायथ्याशी एक छोटासा पाण्याचा झरा होता. त्या पाण्यामुळे तिथे एक छोटंसं हिरवं कुरण तयार झालेलं होतं. गावातले लोक आपल्या शेळ्या-मेंढ्यांना , उंटांना आणि घोड्यांना तिथे चरायला घेऊन जायचे. त्या डोंगररांगांमध्ये असलेले छोटे छोटे पाण्याचे ओहोळ त्या गावासाठी वरदान ठरले होते, कारण तिथला पिण्याच्या पाण्याचा मुबलक साठा वाळवंटातल्या त्या गावासाठी अमृतासमान होता. त्या डोंगरांबद्दल जुन्या म्हाताऱ्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांकडून ऐकलेली कहाणी खरी मानली, तर ते डोंगर प्रत्यक्ष देवदूताने तिथे निर्माण केले होते. अजूनही डोंगरातल्या गुहांमध्ये देवदूत येतात आणि काही दिवस विसावा घेतात अशी आख्यायिका गावात प्रसिद्ध होती. अहमदच्या आपल्या मेंढ्यांच्या कळपावर अतिशय जीव होता. त्यांच्या अंगावरची लोकर कातरतानाही तो इतक्या नाजूकपणे हात चालवायचा, की कधीही त्या प्राण्यांच्या अंगावर जखम व्हायची नाही. त्याने आपल्या पाळीव मेंढ्या अथवा शेळ्या कधीही खाटकाकडे विकल्या नाहीत. त्या मेंढ्यांच्या

बर्झख

हमीद रात्र सुरु झाल्या झाल्या गावातून बाहेर पडून घाईघाईने कब्रिस्तानाच्या दरवाज्यापाशी आला होता.आज त्याच्या ६६५ रात्री चाललेल्या तपस्येची फलनिष्पत्ती होणार होती.प्रत्येक गोष्ट अगदी नियमाप्रमाणे होणं गरजेचं होतं. कब्रस्तानाच्या दरवाज्याची चौकट त्याच्यासाठी अतिशय महत्वाची होती. चौकटीची रेष त्याने आधी हातातल्या काठीने नीट आखून घेतली. वाळूत ओढलेली ती रेष त्याच्यासाठी अक्षरशः जगण्या-मरण्याच्या सीमारेषेइतकी महत्वाची होती. त्या रेषेला मध्य मानून त्याने आपला बकऱ्याच्या कातडीचं आसन कब्रिस्तानाच्या आत अर्धं आणि बाहेर अर्धं अशा पद्धतीने अंथरलं. आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला नऊ नऊ लिंबं आणि आदल्याच दिवशी कब्रिस्तानातून आणलेल्या मातीच्या नऊ-नऊ बाहुल्या मांडून ठेवल्या.बाहेरच्या बाजूला एक मोठ्या माणसाची आणि आतल्या बाजूला एक लहान मुलाची कवटी त्याने एका काळ्या कपड्यावर ठेवली आणि तळहातावर जखम करून आपल्या रक्ताचे थेंब त्या कवट्यांवर सोडले. या सगळ्या सोपस्कारानंतर त्याची तपश्चर्या सुरु झाली. त्या अमावास्येच्या रात्री आकाशात अल असदच्या ( अल असद - सिंह राशीचा तारकासमूह ) ताऱ्यांची तेजस्विता उठून दिसत ह